मुंबई : स्वयंपाकामध्ये मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर नसेल तर पदार्थ मिळमिळीत होतात. जी व्यक्ती रोज स्वयंपाक करते तिला तेल-मसाले काय प्रमाणात टाकले पाहिजेत याचा अचूक अंदाज आलेला असतो. परंतु, जे कधीतरीच पदार्थ तयार करण्यासाठी जे स्वयंपाकघरात जातात त्यांना मसाल्यांचाच काय तर किती मीठ टाकायचे यायाही अंदाज येत नाही. त्यामुळे तुम्ही स्वयंपाकघरात कामाची सुरवात करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा….
मिरचीऐवजी लाल तिखटाचा वापर करा –
पदार्थाला स्वाद आणि तिखटपणा यावा असे वाटत असेल तर वाळलेली लाल मिरची कुटून किंवा लाल तिखटाचा पदार्थात वापर करा. डाळ शिजवून घेतल्यानंतर तडक्यासाठी फोडणी देताना अशा कुटलेल्या लाल मिरचीचा वापर करा. अगदी तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता. अर्थात जेव्हा तुम्ही कुटून मिरची टाकता तेव्हा ती कमी प्रमाणात टाकावी. कारण चिरलेल्या मिरचीच्या तुलनेत कुटलेल्या मिरचीमध्ये तिखटपणा जास्त असतो.
नेहमी मीठ हाताने टाका –
तुम्ही कधी प्रोफेशनले शेफला पदार्थात मीठ टाकताना पाहिले आहे का? हाताने मीठ टाकताना ते सगळीकडे समान प्रमाणात पसरवता येते. आपण बहुतेकजण चमच्याने मीठ टाकतो. स्वाभाविकपणे मीठ जास्त पडते. त्याचबरोबर नेहमी पदार्थ थोडा शिजल्यानंतरच मीठ टाकावे. अनेकदा भाजी शिजावी म्हणून लगेच मीठ टाकले जाते. त्यामुळे खरे तर मीठ जास्त लागते आणि त्याचा पदार्थाच्या चवीवर देखील परिणाम होतो. नेहमीचे मीठ कमी टाकून त्याबरोबर थोडासा खडेमीठाचा वापर केला तर पदार्थाची चव आणखी वाढते.
जिऱ्याचा कुटून वापर –
पदार्थ शिजवताना जिऱ्याचा वापर फोडणी देताना केला जातो. पण पदार्थाला जिऱ्याची चांगली चव यावी असे वाटत असेल तर जिरे तव्यावर भाजून घ्या आणि ते थोडेसे कुटून वापरा. त्यासाठी दोन-चार मिनिटे लागतील पण त्यामुळे पदार्थामध्ये जिऱ्याचा स्वाद चांगल्या प्रकारे मिसळला जातो.
भाजीला रंग आणि तिखटपणा येण्यासाठी –
बहुतेकजण लाल मिरची नंतर टाकतात. ज्यामुळे भाजी जास्त तिखट होते. भाजीत सुके मसाले आणि तिखट नंतर टाकले तर पदार्थाला रंग आणि चव येण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याऐवजी फोडणी करत असताना तेलात तिखट, हळद आणि मसाला पावडर टाकावी. ते जळणार नाही इतपत काळजी घेऊन लगेच चिरलेला कांदा, टोमॅटो, भाज्या टाकाव्यात. या पद्धतीत भाजीत अगदी अर्धा चमचा लाल तिखट टाकले तरी भागते.
सुका मसाला जळू नये यासाठी काय करावे?
अनेकदा भाजीला फोडणी करत असताना मसाले कढईत टाकले ती जळायला लागतात. मसाले जळू नयेत म्हणून सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हे सुके मसाले एकत्र करून त्यावर थोडे पाणी टाकावे. मग हे मसाले कढईतील तेलात टाकल्यास जळत नाहीत.
या सगळ्या टिप्स स्वयंपाक करताना तुम्हांला उपयुक्त ठरतील. त्याचबरोबर पदार्थात मसाल्यांची चव चांगल्या प्रकारे मिसळली जाईल आणि पदार्थ-भाज्या चवदार होतील.