बीड – वेदांता व फॉक्सकॉनमधून राजकारण सुरु आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला? कोणामुळे गेला? हा विचार करायला हवा, असे मत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असते तर वेदांता प्रकल्प गुजरातला जाऊच दिला नसता असे अजित पवार यावेळी म्हणाले.
हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न केले होते. या प्रकल्पाची गुजरात राज्यात वळती झाल्यामुळे राज्यातील तरूणाईला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लाखो रोजगारांपासून तरूणांना वंचित ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणला जाईल असे भाकीत राज्य सरकारकडून केले जात आहे यावर अजित पवार म्हणाले की, त्यांना जो मोठा प्रकल्प आणायचा तो त्यांनी नंतर आणावा. मात्र हा प्रकल्प राज्याला द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
आम्ही सत्तेत असतो तर ‘वेदांता प्रकल्प’ गुजरातला जाऊच दिला नसता.
– अजित पवार(विरोधी पक्षनेते, विधानसभा) @AjitPawarSpeaks #AjitPawar #VedantaFoxconn #Maharashtra #Gujarat #वेदांताप्रकल्प #अजितपवार pic.twitter.com/qa0rWpHMBK— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 18, 2022
तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडनही अजित पवार यांनी यावेळी केले व प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण माहिती घ्यावी त्यानंतर भाष्य करावे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.