नीरव मोदीची न्यायालयासमोर पोकळ धमकी
नवी दिल्ली : पीएनबी बॅंकेला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीची जामीन याचिका न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. दरम्यान, नीरव मोदीने न्यायालयासमोर पोकळ धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. जर भारताकडे आपले प्रत्यार्पण केले तर आपण आत्महत्या करू अशी धमकी नीरव मोदीनं दिली. आपल्याला तरूंगात अन्य कैद्यांकडून मारहाणदेखील करण्यात आल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. यानंतरही न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.
पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे 2 अब्ज डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात, भारतात प्रत्यार्पणाची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या नीरवला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे हजर करण्यात आले. नीरव मोदी याने यापूर्वी न्यायालयात 2 दशलक्ष पौंडांची हमी सादर करण्याचा प्रस्ताव दिला होता, तो आता दुप्पट केला आहे. तसेच ज्याप्रमाणे संशयित दहशतवाद्यांना नजरकैदेत ठेवले जाते, त्याचप्रमाणे स्वत: नजरकैदेत राहण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले. दरम्यान, नीरव मोदीला एप्रिल महिन्यात तसेच गेल्या मंगळवारी तुरूंगात मारहाण करण्यात आल्याचेही त्याच्या वकीलाने न्यायालसमोर सांगितले.
मंगळवारी सकाळी 9 वाजता तुरूंगातील अन्य कैदी नीरव मोदी जवळ आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याला लुटण्याचाही प्रयत्न करण्यात आला. केवळ नीरव मोदीला लक्ष्य केले गेले, असे त्याच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच माध्यमांमध्ये यापुढेही त्याला कोट्यधीश हिरे व्यापारी असे म्हटले गेले तर यापुढेही त्याच्यावर हल्ले होतील. तसेच भारतात नि:पक्ष चौकशीही आपल्याला अपेक्षा नसल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
नीरववर मे 2020 मध्ये खटला चालणार आहे. त्यावेळी तो न्यायालयात शरण येईल किंवा तो साक्षीदारांवर प्रभाव टाकणार नाही याबाबत आपल्याला खात्री वाटत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी त्याला जामीन नाकारला. तथापि, गेल्या सुनावणीच्या वेळी नीरव याच्या मानसिक स्थितीबाबत गोपनीय वैद्यकीय अहवालात नमूद केलेली महिती माध्यमांपर्यंत पोहचल्याबाबत नाराजी व्यक्त करून, यापुढे असे घडू नये अशी तंबी त्यांनी दिली.