नवी दिल्ली- आपण एकमेकांशी लढलो तर करोना जिंकेल. त्याउलट, आपण एकत्रितपणे लढा दिला तर देश जिंकेल, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
दिल्लीतील आप सरकारने वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनची अधिक मागणी केल्याच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाले आहे. त्यावरून आप आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. त्यापार्श्वभूमीवर, केजरीवाल यांनी शनिवारी ट्विट करून वादंग मागे ठेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.
ऑक्सिजनवरून भांडण संपले असेल तर काम करूया का? करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कुणाला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही अशी व्यवस्था एकत्र येऊन निर्माण करूयात. दुसऱ्या लाटेत जनतेला ऑक्सिजनची भीषण टंचाई जाणवली.
तिसऱ्या लाटेत तसे घडू नये, अशी भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली. वादंग निर्माण झाल्यानंतर केजरीवाल यांनी शुक्रवारीही त्यांची भूमिका मांडताना भाजपला प्रत्युत्तर दिले होते. आपण निवडणूक प्रचारात व्यस्त असताना मी रात्रभर जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो. दिल्लीतील 2 कोटी जनतेच्या श्वासासाठी मी लढलो हा माझा गुन्हा ठरला, असे त्यांनी म्हटले होते.