चेन्नई -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी बुधवारी दिल्ली हिंसाचारावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. कणखरपणे हिंसाचार रोखायला हवा. हिंसाचार रोखता येत नसेल तर सत्ता सोडून जा, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दिल्लीतील हिंसाचार म्हणजे गुप्तचरविषयक अपयश आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचा निषेध करतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दौऱ्यावर असताना अतिशय काळजी घेतली जायला हवी होती. मात्र, गुप्तचरांनी योग्यरित्या कामगिरी निभावली नाही. त्यांच्याकडून यापुढे तरी दक्ष राहण्याची अपेक्षा करतो. गुप्तचरविषयक अपयश म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अपयश, असे रजनी येथे पत्रकारांशी बोलतान म्हणाले.
चित्रपटांचा पडदा गाजवणारे रजनी आता प्रत्यक्ष जीवनात राजकीय भूमिका निभावण्यास सज्ज होत आहेत. पुढील वर्षी तामीळनाडूत होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. त्यामुळे ते विविध मुद्द्यांवर भूमिका मांडत असतात. त्यातून ते भाजपला अनुकूल असल्याचा निष्कर्ष वारंवार काढला जातो. मात्र, यावेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.