मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी केलेल्या आरोपाला आता उत्तर देण्यासाठी समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार केली आहे. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने समाजात आणि नातेवाईकांत बदनामी करत असल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांच्या आत्यानं तक्रार केली आहे. गुंफाबाई भालेराव यांनी कुटुंबातील नातेवाईकांची पूर्ण वंशावळ आणि जातीचे दाखलेही सोबत जोडले आहेत. मंत्री असतानाही मलिक मुस्लीम म्हणून हिणवत आहेत.
वानखेडे कुटुंबिय नवबौद्ध नसून ते मुस्लीमच आहेत, असे म्हणून सतत परिवाराची बदनामी सुरु केली आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. जातियवादी वक्तव्य केल्यामुळं नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
समीर वानखेडे यांच्या आत्यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार, आमचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील वरुड कोपा असून आम्हाला सर्वजण नवबौद्ध जातीचे म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे सन्मान देतात. नोकरी आणि कामानिमित्त आमच्यातील काहीजण विशेषतः समीर वानखेडे आणि त्याचे वडिल मुंबई परिसरात राहिलेले आहेत.
मलिक यांनी जाणीवपूर्वक मागासवर्गीय असल्यामुळे त्रास देण्यासाठी खोटी माहिती पुरवून वारंवार आरोप केले आहेत. या आरोपांमुळे माझी आणि कुटुंबियांची मनस्थिती खूप बिघडी आहे. आम्ही मानसिक तणावात शेवटचा उपाय म्हणून आपल्याकडे तक्रार घेऊन आलो आहोत.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यांना उत्तरं दिली जात आहेत.