नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. पुढच्या वर्षी निवडणूक होत असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी कसण्यास सुरूवात केली आहे. भाजपानेही पश्चिम बंगालकडे मोर्चा वळवला असून, ममता बॅनर्जी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. अशातच भाजपाच्या नेत्याने तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट स्मशानात पाठवण्याचीच धमकी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून भाजपाने बंगालमध्ये पक्ष विस्ताराचे काम हाती घेतले. त्याचे काही परिणाम मागील काही निवडणुकींमध्ये दिसूनही आले. मात्र, यात आता भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात भाजपाने तृणमूलवर आरोप केले होते.
दरम्यान, भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी हल्दीयामध्ये झालेल्या एका सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचीच धमकी दिली. पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी केंद्र सरकार काळजी घेईल. विधानसभा निवडणुकीत राज्य पोलीस नव्हे, तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्था असेल,” असे त्यांनी सांगितले.
I tell Mamata di's people, who do mischief, to correct themselves within 6 months or else their hands, legs, ribs & heads will be broken – you'll have to go to hospital before being able to go home. If they increase mischief, they'll be sent to crematorium: D Ghosh, WB BJP chief pic.twitter.com/XyDKJ9LPra
— ANI (@ANI) November 8, 2020
“मी ममता दीदीच्या कार्यकर्त्यांना सांगतो, जे वाईट गोष्टी करत आहेत. त्यांनी ६ महिन्यात स्वतःमध्ये बदल करावेत, नाहीतर त्यांचे हात, पाय आणि डोके फुटतील. घरी जाण्याआधी तुम्हाला रुग्णालयात जावं लागेल. जर त्यांनी जास्त त्रास दिला, तर त्यांना स्मशानभूमीत पाठवलं जाईल,” असा इशारा देत घोष यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पुढील वर्षी निवडणूक होत असून, भाजपानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.