मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच ‘दोन-चार मंत्र्यांना मुद्दाम बदनाम करून तुरुंगात टाकलात तर बाकीचे आमदार आहेतच की! आमच्याकडे कशाचीही कमी नाही. तुम्ही किती जणांना बदनाम करणार? किती लोकांना आत टाकणार?’, असा खडा सवालदेखील त्यांनी यावेळी केला आहे.
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप ऐनकेन प्रकारेण राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे सरकार लवकर जावं ही भाजपची इच्छा आहे, मात्र देशाच्या घटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करतोय त्यामुळे सरकार बरखास्त करायचा अधिकार कुणाला नाही. शिवाय चारचौघांची इच्छा असली तरी सरकार बरखास्त होऊ शकत नाही. विधानसभेत जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत सरकार जाणे शक्य नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
ईडीची धाड पडणं हे आता नित्याचेच झाले आहे. जनतेला भाजपच्या या खेळाची सवय झाल्याने याचं विशेष अप्रूप वाटत नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून भाजपकडून येथे सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे मात्र त्यांचे सरकार असते तर एकदाही छापेमारी झाली नसती, असा दावाही पाटील यांनी केला.
मंत्री नवाब मलिक यांनी ज्या गोष्टी समोर आणल्या आहेत त्यांची एनसीबीने शहानिशा करायला हवी. खोटय़ा प्रमाणपत्राआधारे संबंधित व्यक्तीने सरकारी नोकरी मिळवली आहे. नवाब मलिक यांनी जे आंदोलन उभारले आहे त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे जयंत पाटील यांनी आज जाहीर केले.