जिल्ह्यातील 859 पाणी योजनांचे ई भूमिपूजन
सातारा – जलजीवन मिशनअंतर्गत गावोगावी पाणी पोहोचवण्यात येत आहे. राज्यात अतिशय गतीने पाणी योजनांची कामे सुरु आहेत. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्यावर आमचा भर असून या योजनेत कंत्राटदार अथवा कोणी पैसे खाल्ल्यास त्याचा सत्यानाश होईल. राज्यात “जलजीवन’च्या कामात फसवेगिरी निदर्शनास आल्यास मी स्वतः पाणी योजनांवर धाडी टाकणार असल्याचा इशारा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व 859 पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, पाणी व स्वछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, सागर शिवदास, संतोष जाधव, राहुल बर्गे आदी उपस्थित होते. ना. गुलाबराव पाटील म्हणाले, “”ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देणे हे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. पाणी पुरवठ्याची अंदाजे 1177.09 कोटी इतक्या रकमेची एकूण 794 कामे आहेत.या कामांवर सरपंचांनी स्वत: लक्ष देऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करावीत. या कामांची त्रयस्थ यंत्रणांकडून तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील मोठ्या योजनांच्या कामांची मी स्वत: तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी 2 हजार 226 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला उपअभियंताही देण्यात आला आहे. तसेच 227 अनुकंपाधारक उमेदवारांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काम वाढले असले तरी आता नवीन भरती होणार असल्याने कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.” छोट्या छोट्या वस्ती, वाड्यांसाठी म्हणजे जेथे पाणीपुरवठ्याच्या योजना घेता येत नाहीत अशा ठिकाणी स्व. मीनाताई ठाकरे योजनेतून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्राधान्य आहे. पिण्याचे पाणी ग्रामस्थांना सहज उपलब्ध व्हावे हे मोठे पुण्याचे काम आहे,
हे काम जलजीवन मिशनअंतर्गत सरपंचांनी करावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. आ. महेश शिंदे म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्याला मोठा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्र व राज्याचा निधी ग्रामीण भागापर्यत पोचविण्यासाठी जिल्ह्याचे प्रशासन सक्षमपणे काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहेत.” 2011 च्या जनगणनेनुसार निधी व योजनांची अंमलबजावणी होत असल्याने एक प्रकारे अन्याय होत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. श्री. जयवंशी म्हणाले, “”केंद्र व राज्य शासनाच्या “हर घल जल’ या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला पाणी दिले जाणार आहे. या योजनेची राज्यात सर्वाधिक प्रभावीपणे अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात झाली आहे. या योजनेंतर्गत बहुतांश योजना सौर ऊर्जेवर घेण्यात येणार आहेत. स्व. मीनाताई ठाकरे योजनेतून 45 पाणी साठवण टाक्या बसविण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेने टीमवर्कने काम केल्याने राज्यात आदर्शवत असे काम होत आहे.”
जिल्ह्यातील एक हजार 765 पैकी 859 पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन करण्यात आले. ग्रामीण विकासात जिल्हा कायमच आघाडीवर आहे. झेडपीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात अग्रेसर आहे. जलजीवन अंतर्गत मोठे काम जिल्ह्यात झाले आहे. आगामी काळातही उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात येतील,” असे श्री. खिलारी यांनी सांगितले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली आवटे यांनी आभार मानले. कार्यशाळेस जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची चर्चा
पाणी योजनांच्या ई भूमिपूजन कार्यक्रमास जिल्ह्यातील खासदार, आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमास मंत्री गुलाबराव पाटील व आ. महेश शिंदे हे दोघेच उपस्थित होते. सत्ताधारी व विरोधी गटातील आमदार, खासदारही या कार्यक्रमास अनुपस्थित होते. विशेष म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मात्र, त्यांचेही भाषण झाले नाही. या कार्यक्रमातील लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची खुमासदार चर्चा सभागृहात सुरु होती.
शंभूराजेंच्या एक्साईजपेक्षा माझे खाते मोठे
पाणीपुरवठा विभागाला निधी कमी असल्याने पूर्वी हे मंत्रिपद घेण्यास कोणीही इच्छुक नव्हते. मात्र, आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासाची आवड असल्याने हे खाते मागून घेतले. जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे या खात्यामार्फत होत आहेत. पाच कोटींपर्यंतचे अधिकार जिल्हास्तरावर दिले आहेत. शंभूराज देसाई यांच्या उत्पादन शुल्क विभागापेक्षा आता हे खाते मोठे आहे, असे ना. गुलाबराव पाटील म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.