लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा पाकिस्तानला इशारा
नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीरविषयीचे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या विरोधात कारवाया सुरू केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते दोन्ही देशांच्या सीमा रेषांपर्यंत पाकिस्तानने कुरापती केल्या आहेत. दरम्यान, भविष्यात जर वेळ आली तर सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानला धडा शिकवू असा इशारा लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला आहे.
भारताकडून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या कारवाईनंतर तिथले दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त झाले होते परंतू, आता ते पुन्हा सक्रिय झाले असल्याचे सांगत लष्कर प्रमुख रावत यांनी देशाची सीमा ओलांडण्याचा सुमारे 500 दहशतवादी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. दरम्यान, जर पाकिस्तानने भारतावर नियंत्रण रेषा ओलांडण्याची वेळ आणली तर ते करण्यासही भारतीय लष्कर सज्ज असून पाकला सडेतोड उत्तर देण्यात येईल असेही रावत यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत भारताने पाकिस्तानला अनेक दहशतवाद्यांचे त्यांच्याच देशात असणाऱ्या वावराचे पुरावे दिले आहेत परंतु, पाकने या पुराव्यांना फेटाळून लावत आमच्या देशात दहशतवादी नसल्याचे सांगितले असल्याचेही रावत यांनी यावेळी सांगितले.