मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला नेले असतं तर आनंद झाला असता, असे म्हटले होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसे केंद्राने जाहीर करावे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला हा टोला लगावला. राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीत गेले होते. या भेटीकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवं. मेट्रो कारशेड अडकली आहे. त्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवं. आम्हाला या भेटीसाठी नेले असतं तर बरं झालं असतं, असे विरोधक म्हणत आहे. विरोधी पक्षाला नेण्याने जर राज्याला मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असे राऊत म्हणाले.
केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे काही गोष्टी सरकारी असतात. त्या केंद्राकडे घेऊन जाव्या लागतात. केंद्राला राज्याच्या अडचणी सांगाव्या लागतात. विरोधी पक्षनेते जाणकार आहेत. याबाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना द्यायला हव्यात, असे सांगतानाच राज्याच्या प्रश्नांवर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचं स्वागत आहे, असेही ते म्हणाले.
राऊत आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पक्ष वाढवणं गरजेचे आहे. त्यासाठी माझा दौरा सुरू आहे. इतर गोष्टी होतच राहतील, असं ते म्हणाले.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचे स्वागत केले आहे. मात्र, आम्हाला सोबत नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 12 मागण्यांपैकी 8 मागण्या राज्यांच्या अख्त्यारीत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. पंतप्रधानांना भेटताना राज्यांच्या मागण्या घेऊन जाता कामा नये. त्यांच्याकडे केंद्राशी संबंधितच मागण्या नेल्या पाहिजेत, असा चिमटाही त्यांनी काढला होता.