मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार आले. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेनेतील दोन्हीही गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास मैदान फावड्याने उखडून टाकू असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ठाकरेंशिवाय कुणाचाही मेळावा शिवाजी पार्कवर होऊ देणार नाही. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतल्यास शिवाजी पार्कचं मैदान फावड्यानं उखडून टाकू, असा इशारा युवासेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी दिला आहे. दसरा मेळाव्यावरून युवासेना आता चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाकिस्तान सामन्यावेळी आदेश देऊन ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून टाकली होती. त्याप्रमाणे जर या ४० आमदारांच्या गटाने मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ उखडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कोळी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.