मुंबई – करोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध देशातील रिझर्व्ह बॅंका मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करीत आहेत. मात्र बॅंकांनी भांडवलालाबाबत आगामी काळात हात आखडता घेण्यास सुरुवात केल्यानंतर शेअर आणि विविध बाजारात गोंधळ (टेपर टॅन्ट्रम) उडू शकतो, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने या काळात मुबलक सवलती दिल्या आहेत. त्याकडे पाहून इतर देशांनी सवलती जाहीर केल्या आहेत. नजीकच्या काळात तरी भांडवल सुलभता कमी केली जाणार नाही, असे फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे. मात्र जेव्हा केव्हा या अतिरिक्त सवलती कमी करण्याची वेळ येईल तेव्हा बाजारात गोंधळ उडू शकतो.
त्यामुळे सवलती कमी करण्याचे वेळापत्रक आत्ताच जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसंदर्भात योग्य ते निर्णय घेता येऊ शकतील. अन्यथा ऐनवेळी असा प्रकार घडल्यास जागतिक बाजारावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
हा प्रकार 2013 मध्ये घडला होता. 2008 मध्ये जागतिक मंदी आल्यानंतर फेडरल रिझर्व्हने सवलती दिल्या होत्या.2013 ला या सवलती कमी करणे सुरू झाल्यानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले होते. शेअर बाजार निर्देशांकाबरोबर विविध देशांच्या कर्जरोख्यांच्या मूल्यावर परिणाम होत असतो, असे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त भांडवलामुळे वित्तीय क्षेत्रातील घडामोडी वाढल्या आहेत. ज्यांना या क्षेत्राची माहिती नाही अशा लोकांच्या समृद्धीत भर पडत नाही. त्यामुळे असमानता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च महिन्यानंतर बऱ्याच देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले आहेत. त्याच बरोबर काही कंपन्यांच्या भांडवली मूल्यात मोठी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनानंतर काही सकारात्मक घडामोडी घडल्या आहेत. माहिती-तंत्रज्ञान आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा उद्योगासाठी परिणामकारक वापर सुरू झाला आहे, ही अतिशय चांगली बाब आहे.किंबहुना या तंत्रज्ञानामुळे जागतिक उद्योग आणि अर्थकारणावर करोनाचा परिणाम तुलनेने कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.