मुंबई – समीर वानखेडे यांच्या बोगस कारवाया आणि भारतीय जनता पक्षाच्या संबंधात गेले काही दिवस सतत काहीना काही गौप्यस्फोट करून खळबळ उडवून देणारे राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी आजही एक सूचिक ट्विट प्रसारीत केले आहे. त्यात त्यांनी एका हिंदी शेरचा कौशल्याने आधार घेतला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, बात निकलेगी तो फिर दूर तलब जायेगी, लोक बेवजह उदासी का सबब पुछेंगे !! त्यांच्या या सूचक ट्विटमुळे त्यांच्याकडे अजून बराच मालमसला शिल्लक असल्याचे मानले जात आहे. काही बाबी आपण विधानसभेच्या पटलावर ठेवणार आहोत, त्यामुळे भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असे त्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.
त्यामुळे त्यांच्या आजच्या सूचक इशाऱ्यानंतर त्यांच्या गौप्यस्फोटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नवाब मलिक यांचेही गॅंगस्टर्स संबंध असून त्याचे पुरावे आपण दिवाळीनंतर सादर करू असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना काल मलिक यांनी फडणवीस यांना उद्देशून म्हटले आहे की जर तुमच्याकडे माझ्या विषयी पुरावे असतील तर दिवाळी होण्याची तरी वाट कशाला बघता?.
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
त्यांच्या या आव्हानावर फडणवीसांकडून मात्र कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही. त्यातच आज मलिक यांनी पुन्हा हे ट्विट सादर करून या प्रकरणातील सस्पेन्स गंभीर असल्याचे सूचित केले आहे. हॉटेल ललित मधील गुपिते लवकरच बाहेर येतील त्यासाठी आपण रविवारी पुन्हा भेटणार आहोत असेही त्यांनी पत्रकारांना सूचित केले आहे.