मुंबई – विधानसभेत आज संविधानावर चर्चा झाली. त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान हा सर्वच धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे नमूद करत त्याची पायमल्ली कोणत्याही स्थितीत सहन करणार नसल्याचा सरकारला इशारा दिला.
भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात संविधानाला धोका निर्माण होत आहे. संविधानाला बदलता येणार नाही, पण कुणी असा प्रयत्न केला तर त्या्ंची सत्ता बदलली जाईल, असे ते म्हणाले.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, भारताचे नागरीक म्हणून आपले अधिकार काय, आपली कर्तव्य काय आहेत हे आपल्याला संविधानाने शिकवले. त्यामुळे संविधान हा इतर कोणत्याही धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या संविधानाचा पायाच मुळात संतांच्या शिकवणूकीतून आला आहे. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता, आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला.
संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी आत्मोन्नती आणि विवेकवादाचा पुरस्कार केला. संविधानाच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य यांना मान्यता देण्यात आली आहे. संत जनाबाई आणि संत बहिणाबाई यांनी महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार केला. याचेही प्रतिबिंब संविधानात आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
डॉ.भावळकरांनी सत्यच बोलले
मराठी साहित्य संलेनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी आपल्या भाषणात पुरोगामी महाराष्ट्र आणि संत परंपरेची आठवण करून दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये पुरोगामी विचारसरणीतून निष्पन्न झालेली आहेत.
आणि तेच संविधानात दिसते. फुरोगामी म्हणून हेटाळणी करणाऱ्याना मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी सत्य बोलून दाखवले, असे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी मांडले.
महाराष्ट्रात संविधानाची पायमल्ली सुरू
पण आता मात्र संविधानाची पायमल्ली केली जात आहे. महाराष्ट्रात याची सुरुवात एका राज्यपालाने केली. राज्यातील सर्वोच्च पदावर बसून त्यांनी राजकीय निर्णय घेतले. राजकीय वक्तव्ये केली.
या राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्याबाबत अश्लाघ्य वक्तव्य केले. यानंतर दोन पक्ष फोडून महायुती सरकार आले, या प्रकरणी तीन वर्ष झाले तरी कोर्टात निकाल आलेला नाही.