नवी दिल्ली – लहान मुले सकाळी 7 वाजता शाळेत जातात. तर मग न्यायाधीश आणि वकिल त्यांचे काम सकाळी 9 वाजता का सुरू करू शकत नाहीत, असा सवाल देशाचे पुढचे सरन्यायाधीश यु यु ललित यांनी आज उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज एका खटल्याचे कामकाज सकाळी 9.30 वाजता सुरू केले. त्यावर अतिरिक्त सॉलिसीटर जनरल मुकुल राहोतगी यांनी आनंद व्यक्त केला. तेव्हा न्या. ललित यांनी वरिल भाष्य केले.
येत्या ऑगस्ट महिन्यात ते सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. सामान्यत: सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सकाळी साडेदहा वाजता सुुरू होते. ते आज एक तास अगोदर सुरू करण्यात आले. कोर्ट नंबर 2 च्या कामकाजाला आज सुरूवात झाली तेव्हा न्या. एस. रविंद्र भट आणि न्या. सुधांशु धुलिया हे त्यांच्यासमवेत होते.
साडेनउची वेळ अगदी योग्य असल्याचे रोहोतगी यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाचे कामकाज लवकरच सुरू झाले पाहिजे असे आपल्याला नेहमीच वाटते असे ललित यांनी सांगितले. आपण 9 वाजताच काम सुरू केले पाहिजे असे सांगत त्यांनी लहान मुलांचे उदाहरण दिले. ते पुढे म्हणाले की जेव्हा प्रदीर्घ सुनावणीची आवश्यकता नसेल तर सकाळी 9 ला काम सुरू करून साडेअकरा पर्यंत केले पाहिजे.
नंतर अर्धा तास ब्रेक घेतल्यानंतर दुपारी दोन पर्यंत कामकाज पूर्ण केले पाहिजे. त्यामुळे संध्याकाळी अधिक काम करायला तुम्हाला वेळ मिळू शकेल. सध्या सर्वोच्च न्यायालयात सकाळी साडेदहा ते दुपारी 4 असे कामकाज चालते. दुपारी 1 ते 2 या वेळेत भोजनाची सुटी असते.