मुंबई : मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांच्यावर आता पर्यंत तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले,’तमाम हिंदू समाजा विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा शर्जिल उस्मानी अजून मोकाट हुंदडतोय. त्याला अटक न करता पोलीस बेकायदेशीर काम करतांना दिसत आहे. ते पुढे म्हणाले, बेकायदेशीर काम करणारे पोलीस आत्ता कुठं आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. राणेसाहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेसाहेबांच्या मागे ठाम उभे आहोत.’
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी लाथा मारा म्हंटले तर ते ठाकरीबाण आणि इतर कोणी दुसरे काही बोलले तर त्यांची जीभ घसरली ही ठाकरे सरकारने दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे.’
‘आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही. अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही.