पुणे : महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग अनुकूल झाले नाहीत. त्यामुळे प्रभागात तिकिटासाठी झगडावे लागणार आहे. असे असताना भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या काही माजी नगरसेवकांचा सध्या चांगलाच गोंधळ उडाला आहे. राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या सारीपाटात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास प्रभाग रचना बदलू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीत अथवा महाविकास आघाडीत जायचे, की नाही? यावरून या माजी नगरसेवकांची कोंडी झाली आहे.
सध्याच्या निर्णयानुसार महापालिका निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहेत. यासाठी प्रभाग रचनेतील आरक्षणे तसेच प्रभागांच्या रचनेमुळे भाजपचे 14 ते 15 नगरसेवकांची अडचण झाली आहे. त्यामुळे या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादीकडून तयारी सुरू होती. मात्र, राज्यातील अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे पक्ष बदलण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांची कोंडी झाली आहे.
2017 च्या निवडणुका चार सदस्यांच्या प्रभागात झालेल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपचे विक्रमी 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले. त्यानंतर, 2019 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला रोखण्यासाठी मुंबई वगळता इतर राज्यातील महापालिकांसाठी 3 सदस्यांचे प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीचेच वर्चस्व असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रभाग रचना महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादीला अनुकूल झाली आहे. त्यातच चारच्या प्रभागात तीनच जण उमेदवार असल्याने ज्या प्रभागांमध्ये भाजपचे चारही नगरसेवक होते, अशा प्रभागात एका जादा उमेदवाराला तसेच नवीन इच्छुकांना संधी देताना भाजपची दमछाक होणार होती.
त्यामुळे आपल्या भाजपकडून तिकीट मिळेल का नाही, याबाबत संभ्रमात असलेले अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. मात्र, महापालिका निवडणुका टप्प्यात आलेल्या असतानाच आता राज्यात अचानक बदललेल्या सत्तेच्या गणितांचा परिणाम महापालिका निवडणुकांवरही होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनाही बदलली जाऊ शकते. त्यामुळे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत काठावर असलेले अनेक जणांचा चांगलाच गोंधळा उडाला आहे.