नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्षपद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहेच. त्यामुळे अध्यक्ष निवडण्याची घाई करण्याची अजिबात गरज नाही, इतक्यात पक्षाचा नवीन अध्यक्ष नेमला नाहीं तर पक्षावर काही आकाश कोसळणार नाहीं अशी भूमिका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी मांडली आहे.
आज पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, पक्षात अंतर्गत निवडणुका घेऊन नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी जे पत्र पाठवण्यात आले आहे त्या पत्रावर माझी स्वाक्षरी मागण्यात आली नव्हती आणि जरी संबंधीत नेत्यांनी ती मागीतली असती तरी मी ती दिली नसती असे ते म्हणाले.
पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली नाही तर कॉंग्रेसला अनेक दशके विरोधात बसावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी म्हटले आहे
त्यावर प्रतिक्रीया विचारली असता खुर्शिद म्हणाले की, यापुर्वीही निवडणुका न घेता नियुक्त्यांच्या पद्धतीने पदाधिकारी नेमले गेले आहेत तरीही पक्षाला फार नुकसान आलेले नव्हते हे त्यांनाहीं चांगले माहिती आहे.
ज्या नेत्यांनी सोनियांना पत्र पाठवले आहे त्यांना सोनिया गांधी यांचे दार कायमच मोकळे होते. त्यामुळे त्यांनी पत्र पाठवण्याऐवजी त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून हीं मागणी केली असती तरी चालले असते असे ते म्हणाले.