नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. अभिषेक यांना 6 सप्टेंबरला तर रुजिरा यांना त्याआधीच 1 सप्टेंबर रोजी बँक खात्यांच्या तपशीलासह ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. याच दरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असे म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे.
ईडीने याआधी 1 सप्टेंबरला रुजिरा बॅनर्जी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र दोन लहान मुलं असल्याने उपस्थित राहण्यास नकार देत त्यांनी कोलकातामधील आपल्या घरी चौकशी करावी अशी विनंती केली होती. याच दरम्यान दिल्लीला जाताना अभिषेक बॅनर्जी यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी “नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेत जे मी बोललो होतो त्याचा पुनरुच्चार करत आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात माझा 10 पैशांचाही संबंध असल्याचं सिद्ध करू शकले तर ईडी किंवा सीबीआय चौकशीची गरज नाही. मी स्वत: सर्वांसमोर फाशी घेईन” असं म्हटलं आहे.
“मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. पण ते गोष्टी सार्वजनिक का करत नाही आहेत? कोलकातामधील प्रकरणासाठी मला दिल्लीत हजर राहण्याचं समन्स दिलं आहे” असा संताप अभिषेक यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा उल्लेख न करता भाजपा नेत्याचं नाव नारदा लाच प्रकरणी दाखल चार्जशीटमध्ये का नाही? असा सवाल केला आहे.
कोळसा घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एका कंपनीत अभिषेक यांचे वडील अमित बॅनर्जी हे संचालक आहेत. कोळसा घोटाळ्याचा तपास सीबीआय करीत आहे.
गेल्या वर्षी 27 नोव्हेंबर रोजी सीबीआयच्या कोलकता लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ईस्टर्न कोलफिल्डच्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रात अवैध खाणकाम केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. ईडीने पुतण्या अभिषेक बॅनर्जीला जारी केलेल्या समन्सवरून ममता भडकल्या आहेत. आपण यांना घाबरणार नाही, असे ममतांनी म्हटले आहे.