पिंपरी – शालेय वर्ष सुरू होऊन, एक महिना उलटला, तरी देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झाले नसल्याची तक्रार नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांना हे साहित्य तत्काळ उपलब्ध न करुन दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या अण्णाभाऊ साठे शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, अद्याप विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, रेनकोट, शूज, सॉक्स आदी शालेय साहित्य वाटप केले नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिका शाळांमध्ये शहरातील गोर-गरीब व कष्टकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होऊन एक महिना उलटला, तरीदेखील हे साहित्य न मिळाल्याने या होतकरु विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
महापालिका व शिक्षण समितीला केवळ शिक्षक भरती, साहित्य खरेदी, सीसीटीव्ही खरेदी, अभ्यास दौरा अशा अनेक विषयांमध्ये स्वारस्य आहे. गरीबांची मुले शिकली काय आणि नाही शिकली काय, याचे सत्ताधाऱ्यांना सोयरं सूतक नाही. किमान या बाबतीत तरी संवेदनशीलता दाखवून, सत्ताधारी भाजपने या महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करावे, अशी माफक अपेक्षा शिलवंत-धर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.