माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वक्तव्य
नांदेड : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दोन महिने उलटले आहेत. परंतु, अजूनही भाजपला आपण सत्तेत येणार असल्याची आशा असल्याचे दिसत आहे. कारणशिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे, असे आशादायी वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच मनसेला सोबत घेण्याची गरज नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेवर खोचक टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. “मुंबईच्या शक्तिशाली मातोश्रीचा शक्तिपात झाल्यानेच दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली. शिवाय शिवसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा म्हणजे एकविसाव्या शतकातील आश्चर्य आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी, शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए ,सुबह का भुला श्याम को आया, असे आम्ही समजू. तसेच मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही आणि तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.