पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज चांगलीच शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील यांनी आज, आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं वक्तव्य एका कार्यक्रमावेळी बोलताना केलं होत.
पाटलांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी निशाणा साधताना, ‘निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं,’ असा टोला त्यांनी लगावला होता.
अशातच आता चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी, “अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मुख्य म्हणजे भविष्यात शरद पवारांना एखादं मोठं पद कोणाला द्यायचा निर्णय घ्यावा लागला तर ते नक्की कोणाला देतील याचा अजित पवारांनी विचार करायला हवा” असा पलटवार केला.
चंद्रकांत पाटील यांनी, यावेळी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या बोलण्यामागे, शरद पवार एखादं महत्वाचं पद देताना मुलगी सुप्रिया सुळे यांची निवड करतील की पुतणे अजित पवार यांची असाच प्रश्न दडल्याची चर्चा आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“मी कोल्हापूरला परत जाणार या वाक्याने कोणीही हुरळून जाऊ नये. घाबरूनही जाऊ नये. मी केंद्राने दिलेले मिशन पूर्ण होईपर्यंत कुठेही जाणार नाही. आयुष्यात कुठेतरी स्थिरावायचं असतं, त्या अर्थी मी गिरीश बापटांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन बोललो होतो. मी जे बोललो त्याचा संदर्भ लगेच बॅग आवरून जाण्याचा नाही.”
“अजित पवार आता बोलू लागले आहे. त्याला आम्ही उत्तर देणार हे नक्की. कारण हा केवळ क्रिया आणि प्रतिक्रियाचा खेळ आहे. अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मुख्य म्हणजे भविष्यात शरद पवारांना एखादं मोठं पद कोणाला द्यायचा निर्णय घ्यावा लागला तर ते नक्की कोणाला देतील याचा अजित पवारांनी विचार करायला हवा.”