पश्चिम बंगाल भाजप अध्यक्षाच्या वक्तव्याने वादंग
कोलकता: पोलीस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केल्यास भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना चोपावे. त्यातून कुठली समस्या निर्माण झाल्यास आम्ही मॅनेज करू, असे अजब वक्तव्य पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केले. त्यामुळे मोठेच वादंग उभे राहिले आहे.
भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना खासदार असणाऱ्या प्रदेशाध्यक्ष घोष यांनी राजकीय वाद निर्माण करणारे वक्तव्य केले. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याची बाब नित्याची बनली आहे. मात्र, खऱ्या गुन्हेगारांना पकडण्याऐवजी पोलीस आमच्याच कार्यकर्त्यांना गोवतात. भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या गुंडांची आणि पोलिसांची भीती बाळगू नये, असे ते म्हणाले. पुढे बोलताना घोष यांनी आणखीच कहर केला. भाजपपुढे तृणमूल नेते आणि पोलीस कुणीच नाहीत. जर माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांना गजाआड केले जाऊ शकते; तर तृणमूल नेते आमच्या दृष्टीने मच्छर आणि किडे आहेत, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, घोष यांच्या वक्तव्याचा तृणमूलकडून निषेध करण्यात आला. त्या वक्तव्यातून भाजप नेत्यांची खुनशी वृत्तीच उघड होते. पश्चिम बंगालमधील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आणण्यासाठी तशाप्रकारची चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत, अशी प्रतिक्रिया तृणमूलने दिली. तर हिंसाचाराला चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्यावरून पोलिसांनी घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतरही घोष नरमले नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्यास मी पुन्हा तसेच बोलेन, असे त्यांनी म्हटले.