नवी दिल्ली – देशात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र सरकारने लावलेल्या अव्वाच्या सव्वा करांमुळे ही दरवाढ झाल्याचं स्पष्ट आहे. मात्र त्यातच सत्ताधारी भाजप नेत्यांकडून इंधन दरवाढीवर अजब विधानं करण्याचा धडाका सुरू आहे.
देशात पेट्रोल २०० रुपये प्रतिलिटर झालं तर मोटारसायकवरुन ट्रिपल सीट प्रवास करावा असा अजब सल्ला भाजप नेत्यानं दिला आहे. आसाम भाजपचे प्रदेशाध्यक्ष भावेत कालिता यांनी हा अजब सल्ला दिला आहे. राज्य सरकार दुचाकीवर दोन ऐवजी तीन लोकांना प्रवासाला परवानगी देईल असं त्यांनी म्हटलं आहे.
याआधी भाजपच्या नेत्यांनी इंधन दरवाढीवर अजब तर्क वितर्क लावले आहेत. यामध्ये करोना विरोधातील लढाईत खूप खर्च झाल्याने त्याची भरपाई तेलाच्या वाढत्या दरातून केली जात असल्याचं वक्तव्य आणि सर्वांना मोफत लसीचा खर्च सरकार करतंय या विधानांचा समावेश आहे.
दरम्यान सर्वसामान्यांसाठी अजब विधानांपेक्षा इंधन दर कपात करणं महत्त्वाचं वाटत आहे. मात्र सरकार त्याबाबत गंभीर नसल्याचं चित्र आहे.