मुंबई – परतीच्या पावसामुळे आणि वादळी अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदील झाला असून मदतीसाठी सरकारकडे विनंती करत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच अधिकाऱ्यांशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, निवडणूकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे आता आभासी पध्दतीने बांधावर जात आहेत, उद्या लोकांनी तुम्हाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री मान्य न करता आभासी मानलं तर, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
निवडणूक पूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे आता आभासी पध्दतीने बांधावर जात आहेत ,उद्या लोकांनी तुम्हाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री मान्य न करता आभासी मानलं तर…..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 17, 2020
दरम्यान, मनसे प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या. अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल, असे ट्विट त्यांनी केले होते.