नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांची सरकारकडून मोठीच नाकेबंदी करण्यात आली आहे. सीमा भागातील रस्ते कॉंक्रिटचे पक्के अडथळे उभारून बंद करण्यात आले असून तारांचे कुंपण उभारून तसेच रस्त्यांवर खिळे ठोकून त्यामार्गावर एकही वाहन येणार नाही अशी दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे आंदोलकांना बाहेर पडणे किंवा नवीन आंदोलक धरण्याच्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला जात असून त्यातच सीमेवरील पोलीस फौज फाटा आणखी वाढवण्यात आला आहे. त्यावर आता शेतकरी आंदोलक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,’आम्ही शेतकरी आहोत. आम्ही घाबरुन जाणार नाही.
दिल्ली आणि गाझीपुर सीमा तसेच दिल्ली आणि हरियाना सीमेवर सरकारने हे अडथळे उभारले आहेत त्या अनुषंगाने शेतकरी आंदोलक यांनी ही भाष्य केले आहे. “आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर लाथ मारू तेथे पाणी काढू, या परिस्थतीला आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. आम्ही इथून माघारी जाणार नाही .’
दरम्यान , सरकारने या भागात तारांचे कुंपण तसेच मोठमोठे बॅरिकेट उभे करून आंदोलकांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलकांनी तसेच राजकीय पक्षांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. त्यात आता राहुल गांधी यांनीही यानिमीत्ताने उडी घेतली आहे.