दिग्विजय सिंह: झाकिर नाईकचा दावा फेटाळला का नाही?
इंदूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकावरून (एनआरसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी प्रथम त्यांच्या आई-वडिलांचे जन्मदाखले दाखवावेत. त्यानंतर जनताही कागदपत्रं दाखवेल, असे दिग्विजय यांनी म्हटले.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात देशभरात निदर्शने केली जात आहेत. निदर्शकांकडून प्रस्तावित एनआरसीलाही विरोध दर्शवला जात आहे. एनआरसीची प्रक्रिया सुरू झाल्यास सरकारी सेवकांना कुठलीही कागदपत्रे सादर करणार नाही, अशी भूमिका निदर्शकांनी घेतली आहे.
त्याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर दिग्विजय यांनी मोदींना उद्देशून शाब्दिक टोमणा लगावला. वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकिर नाईक याने केलेल्या एका दाव्यावरूनही दिग्विजय यांनी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
भारत सरकारकडून एक प्रस्ताव मिळाल्याचा दावा नुकताच नाईकने केला. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा. तसे केल्यास भारतात परतण्याची अनुमती दिली जाईल, असा तो प्रस्ताव असल्याचे नाईकने म्हटले होते. मोदी आणि शहा यांनी नाईकला देशविरोधी ठरवले आहे.
त्याने केलेला दावा मोदी आणि शहा यांनी आतापर्यंत फेटाळला का नाही? तो दावा फेटाळला जात नसेल तर तो खरा मानला जाईल, अशी टिप्पणी दिग्विजय यांनी केली.