इस्लामाबाद- भारताच्या पश्चिमेकडील तीन नद्यांवर पाकिस्तानचा हक्क आहेत आणि या नद्यांचा प्रवाह वळविण्यासाठी भारताने केलेला कोणताही प्रयत्न हा आक्रमक कृत्य मानला जाईल, अशा शब्दात पाकिस्तानने थयथयाट केला आहे. परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी आपल्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान ही प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या टिप्पणीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. भारत सरकार पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखेल, असे या आठवड्याच्या प्रारंभी हरियाणामध्ये निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले होते.
सिंधू जल कराराअंतर्गत पश्चिमेकडील तीन नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानला विशेष अधिकार आहे. या नद्यांचा प्रवाह वळविण्याचा भारताने केलेला कोणताही प्रयत्न आक्रमक कृत्य मानला जाईल आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला अधिकार आहे, असे असल्याचे फैसल म्हणाले. मात्र त्यांनी या तीन नद्यांचा नामोल्लेख केला नाही.