पालकमंत्री शिंदे यांनी केली आ. जगताप यांच्यावर टीका
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
श्रीगोंदा – श्रीगोंद्यात आता संघर्ष राहिला नाही. तीन-चार दिवसांत अनेक गोष्टी सर्वांसमोर येतील. अनेक जण सहकार्य करणार आहेत. श्रीगोंद्यातील राजकारणावर आपला सूक्ष्म अभ्यास आहे. आपण जर वेळ दिला, तर श्रीगोंद्याची जागा बिनविरोध होईल, अशी गुगली खा. डॉ सुजय विखे यांनी श्रीगोंद्यात टाकली.
बबनराव पाचपुते यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, पाचपुते यांचे 75 हजारांचे मताधिक्य असेल. बबनदादा तुम्हाला एकच विनंती आमच्या ही कार्यकर्त्यांना सोबत घ्या, त्यांना वंचित ठेवू नका.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, तुमचा गडी (आ. राहुल जगताप) नीट नव्हता, म्हणून कुकडीच्या पाण्याची अडचण झाली. निवडणुकीनंतर कुकडीच्या पाण्याचा कायदा करू. पण हक्काचे पाणी आपण आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लोकसभेच्या वेळी विखे जिल्ह्यातच उभे राहून परक्याला घरी पाठवण्याची भाषा झाली. आता हे (रोहित पवार) कोठून आले. ते पार्सल परत पाठविण्यासाठी मी सज्ज आहे.
पाचपुते म्हणाले, राष्ट्रवादीसाठी रात्रंदिवस काम करून खूप त्रास वाट्याला आला. मला संपवायला निघालेले आता फोन करून सांगतात आमचं तिकीट तुमच्यासाठी तयार आहे. ही दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. यावेळी सदाशिव पाचपुते, भगवानराव पाचपुते, विक्रमसिंह पाचपुते, अर्जुनराव बोरूडे, दिनकर पंधरकर, विठ्ठलराव चेकले, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, प्रा. तुकाराम दरेकर, ज्येष्ठ नेते दादासाहेब जगताप, दत्तात्रेय पानसरे, संदिप नागवडे, शिवसेने चे संतोष खेतमाळीस, आरपीआय चे बंडू जगताप, ऍड. सुभाष डांगे, संतोष लगड, मीठु शेख यांची भाषणे झाली. मिलिंद दरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
..तर अडीच वर्षांनी ते जेलमध्ये जातील
पवार कुटुंबियांवर टीकास्त्र सोडताना डॉ. सुजय विखे म्हणाले, त्यांनी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केला. त्यामुळे ईडीची चौकशी सुरू झाली. महाराष्ट्रासाठी खूप केल्याचं संगणाऱ्यांकडे सात खाजगी कारखाने कोठून आले. चौकशी पूर्ण होऊन दोषारोप निश्चित झाले, तर ते आगामी अडीच वर्षांच्या आता जेलमध्ये जातील.