नवी दिल्ली : देशात विकास आणि रोजगार निर्मितीवरन नेहमी टीका होताना पाहायला मिळते. त्यातच आता पुन्हा एकदा विरोधकांनी देशाच्या विकासावरून सरकारवर टीका केली आहे. जर आपण पंतप्रधान असतो तर विकास केंद्रीत धोरणांऐवजी रोजगार निर्मितीवर जास्त लक्ष दिलं असतं असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ऑनलाइन चर्चेदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले.
अमेरिकेतील हार्वर्ड स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत राहुल गांधी यांनी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी निकोलस यांनी राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधानपदी निवडून आला असतात तर कोणत्या धोरणांना प्राथमिकता दिली असती असं विचारण्यात आले. “मी विकास केंद्रीय धोरणांऐवजी रोजगार केंद्रीय कल्पनेवर भर दिला असता. आपल्याला विकास हवा आहे असे मी सांगेन, पण निर्मिती आणि रोजगार उपलब्ध होण्यासाठी आम्ही सर्व काही करु,” असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.
“सध्या जर तुम्ही विकास पाहिला तर विकास आणि रोजगार निर्मिती, मूल्यजोड, निर्मिती यांच्यात ज्या प्रकारचं नातं हवं तसं दिसत नाही. मी एकाही चिनी नेत्याला भेटलेलो नाही ज्याने आमच्याकडे रोजगाराची समस्या असल्याचं सांगितलं,” असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले. “जर रोजगाराचे आकडे दिसणार नसतील तर मला नऊ टक्क्यांच्या आर्थिक विकासात कोणताही रस नाही,” असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी सरकारने सर्व संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप करत २०१४ च्या आधी ज्यापद्दतीने संस्था कोणताही दुजाभाव न करता काम करत होत्या तशी परिस्थिती राहिलेली नसल्याचे म्हटले.