नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणात कोर्टात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल काय असेल याचा मला अंदाज नाही, पण जर मला त्या प्रकरणात कारागृहात जावे लागले तर तो माझ्यासाठी आशीर्वादच असेल असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्यावेळी त्या बोलत होत्या. बाबरी मशिद पतन प्रकरणी जो खटला सुरू आहे त्या खटल्यात अलिकडेच उमा भारती यांची साक्ष झाली. त्या संबंधात बोलताना त्या म्हणाल्या की या प्रकरणात जे काही सत्य आहे ते मी कोर्टात कथन केले आहे.
अयोध्य प्रकरणाचा निकाल काय येईल याची आपल्याला कल्पना नाही पण जर मला कारागृहात जावेच लागले तर तो माझ्यासाठी एक अशीर्वाद असेल असे मी मानते असे त्या म्हणाल्या.
राम मंदिर बांधल्याने करोना हटणार आहे काय असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले होते त्यावरही त्यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, हे दोन वेगळे विषय आहेत.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी देशातील सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय यंत्रणा लढत आहे. या यंत्रणेशी संबंधित नसलेले लोक अयोध्येत मंदिर उभारणी करणार आहेत. त्या कामामुळे करोना नियंत्रणाच्या कामावर कसलाही विपरीत परिणाम होणार नाही. जेव्हा मोदी अयोध्येत भूमीपूजन करतील त्यावेळी पवारांनी रामनामाचा जप करावा अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली.
अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा एक दिवस हा माझ्यासाठी पाच हजार जीवनापेक्षा अधिक महत्वाचा दिवस आहे असे त्या म्हणाल्या. या भूमीपूजनासाठी मला निमंत्रण मिळणार आहे की नाही हा माझ्यासाठी विषयच नाही. ते माझ्यासाठी महत्वाचे नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.