औरंगाबाद – सतत चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. ते औरंगाबाद येथे बोलत होते.
राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं ? असा वादग्रस्त प्रश्न राज्यपाल यांनी जाहीर कार्यक्रमात उपस्थित केला. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
कोश्यारी पुढं म्हणाले की, शिवाजी महाराजांना कमी लेखतोय, असं नाही. पण ज्या माणसाला गुरू नाही, त्याची महती उरत नाही. समर्थ रामदासांच्या कृपेने आम्हाला राज्य मिळालं. गुरुदक्षिणा म्हणून राज्याचा चाव्या तुमच्याकडे देतो, असं शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं होतं, असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.
दरम्यान राज्यपाल यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला. राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी. अन्यथा बदनामीचा दावा दाखल करू, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.