ठाणे – गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून सामूहिक एकजूट दाखविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने सन 2018-19 चा स्मार्ट ग्राम पुरस्कार व सन 2019-20 चा आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव या पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील एकूण 12 ग्रामपंचायतीना तालुका आणि जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, स्व. आर. आर. पाटील यांनी ग्रामविकासामध्ये केलेले काम राज्य आणि देशासाठी मार्गदर्शक आहे. ग्राम विकासासाठी आबांनी मांडलेल्या संकल्पनावर आजही गाव विकास सुरू आहे. लोकोपयोगी व सामाजिक एकोपा जपण्याची स्वयंप्रेरणा जनमाणसात रुजवण्याचे काम आबांनी केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील गावे राज्यासाठी आदर्श निर्माण करणारे व्हावेत असा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून गावाच्या विकासासाठी नियोजन करावे.
प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी शासन आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.आपल्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.