राखी रासकर
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सिंचनाच्या पर्याप्त सोयी असल्या पाहिजेत. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाला पाहिजे. शेती अत्याधुनिक व्हायला हवी. शेतकरी समृद्ध होण्यासाठी हे प्रेरक विचार मांडणारे कृषिक्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले या देशातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे आद्य समाजसुधारक. त्यांनी लिहिलेला “शेतकऱ्यांचा असूड’ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समाजापुढे आणणारा पहिलाच ग्रंथ! सव्वाशे वर्षे उलटली तरी शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. बळीराजाचा आक्रोश सुरूच आहे. कधी अवकाळी तर कधी दुष्काळी अशा अस्मानी संकटात संघर्ष करणारा शेतकरी अनास्थेमुळे पुरता भुईसपाट झाला आहे. जगाचा अन्नदाता शेतकऱ्याची परिस्थिती बदलायची असेल तर म. फुले यांचे विचार पथदर्शी मानून वाटचाल करायला हवी.
18 जुलै 1883 मध्ये उगारलेला “शेतकऱ्यांचा असूड’ येथील व्यवस्थेवर अजूनही बसला नाही. खरेतर शेतकऱ्यांचा आक्रोश अद्याप राज्यकर्ते असणाऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. म्हणून आजही शेतकरी खचलेला, पिचलेला आहे. काहीजणांनी तर टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्राच संपवली आहे. काळ्या आईची मनोभावे सेवा करणाऱ्या बळीराजाला न्याय कधी मिळणार हा मोठा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
न्यायासाठी नशिब आणि व्यवस्थेशी तो झगडतो आहे. जागतिकीकरणाच्या काळात औद्योगिक उत्पादन करणाऱ्या कारखानदाराला जसा आपल्या वस्तूंचे भाव ठरविण्याचा अधिकार आहे, तसा तो शेतकऱ्याला आजही नाही. शेतकऱ्याला “जैसे थे’ ठेवण्यात येथील व्यवस्था कमालीची यशस्वी झाली आहे, असेच म्हणावे लागेल. भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान समजली जाते, मात्र शेती अथवा शेतकरी केंद्रबिंदू मानून कधी नियोजन झाले नाही.
कर्जाच्या खोल गर्तेत शेतकरी अडकला आहे. कर्जाच्या फासामुळे अनेकांना जीव द्यावासा वाटतो. काबाडकष्ट करूनही हातातोंडाची मिळवणी करणे अवघड होत असल्याने परिस्थिती गंभीर वळणावर आहे. यावेळी म. फुलेंच्या सूडाचे फटकारे व्यवस्थेवर बसले तरच येथील यंत्रणा खडबडून जागी होईल.
शेतकरी आणि कष्टकरी यांची पिळवणूक आणि गुलामगिरी विरोधात सर्व आघाड्यांवर त्यांनी संघर्ष केला. त्यांचा संघर्ष हा सत्यशोधनावर आधारलेला होता. त्यांचे शेतीसंबंधीचे विचार आजही प्रासंगिक आहेत. निसर्गाचा असमतोल झाल्याने व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण होणाऱ्या, उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांजवळ काहीच पर्याय राहत नसल्याने त्यांना आत्महत्या कराव्या लागणे खरंच लांच्छनास्पद आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी त्यांनी शेती व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे व ते सोडविण्याचे उपाय याबाबत परखड चिकित्सा केली आहे. कितीही अन्याय व जुलूम झाला तरी तो आपल्या नशिबाचा भाग आहे म्हणून शेतकरी सहन करतात. कधीही संघर्ष करीत नाही. त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांना समजत नाही. त्याचे कारण त्यांच्या अज्ञानात आहे.
म. फुलेंनी आजच्या स्कील इंडियाच्या धर्तीवर ज्ञानाधारीत शिक्षणासोबत कौशल्यपूर्ण मूल्याधिष्टीत शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादीत केले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेत शेती व औद्योगिक शिक्षण सक्तीचे केले होते. त्यांचे विचार आज अंमलात आणले तर शेतकऱ्यांना कधीही आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेतकऱ्यांचे दैन्य कायमचे संपवायचे असेल तर असूडाला पर्याय नाही हे नक्की.