जामखेड: लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी आमचा कोणताही कार्यकर्ता खचून जाणार नाही. दुष्काळी भागात आमचे काम सुरूच ठेवणार आहोत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा विधानसभेची तयारी सुरू करणार आहोत, असे मत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले होते, यावेळी ते बोलत होते.
रविवारी (दि.26) जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, त्यानंतर जामखेड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, अमजद पठाण, नगरसेवक प्रा. संजय वराट, नगरसेवक डिंगाबर चव्हाण, ऍड. हर्षल डोके, चेअरमन प्रदीप पाटील, डॉ. अविनाश पवार, विजय धुमाळ, नरेंद्र जाधव, प्रशांत राळेभात, प्रकाश काळे, प्रा. लक्ष्मण ढेपे, राजेंद्र पवार, उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, की देशात चुकीचे जातीय विधान करूनही प्रज्ञा साध्वी सारखे अनेकजण निवडून आले, याचे एकमेव कारण म्हणजे मोदी लाट आहे. ही लाट मागील निवडणुकीसारखी सुप्त राहिली. मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक कामे करूनही आमचा पराभव झाला आहे. यातुन खचून न जाता पुन्हा जोमाने काम करणार आहे.
येथील आमच्या उमेदवाराला वेळ कमी मिळाला आणि ताकदही कमी पडली. भाजपच्या उमेदवाराला पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात सर्वात कमी मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या दोन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने, एक दिलाने काम केले आहे. या मतदारसंघात विकासाचे काम झाले नाही. आज दुष्काळी परिस्थिती लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. याकडे मंत्र्यांनी लक्ष दिले नाही. मतदार संघातील अनेक वर्षे झाले, तरी प्रश्न सुटले नाहीत. ही खदखद लोकांच्या मनात आहे. दुष्काळी भागातील परिस्थिती पाहणी करून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्या भागातील प्रश्न घेऊन, असे ते म्हणाले.