सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरिक्षण
नवी दिल्ली : सीबीआय म्हणजे काही देव नाही की तपासाची सर्व प्रकरणे त्याच्याकडे सोपविली जायला हवीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. प्रत्येक प्रकरणाचा तपास जर सीबीआयकडे देऊ लागलो तर अराजकता निर्माण होईल आणि ही तपास संस्था आपले काम व्यवस्थितपणे करू शकणार नसल्याचे मतही यावेळी न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा एक निर्णय रद्दबातल ठरविला. राज्यातील एक व्यक्ती गायब झाल्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात आला होता. उच्च न्यायालयाचा हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला.
न्या. एन व्ही रमना आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. हा निकाल देत असताना सीबीआय म्हणजे काही देव नाही की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि ते सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करू शकतात. प्रत्येक प्रकरणाचा तपास जर सीबीआयकडे देऊ लागलो तर अराजकता निर्माण होईल आणि ही तपास संस्था आपले काम व्यवस्थितपणे करू शकणार नसल्याचे न्यायालयाने यावेळी म्हटले. हरियाणातील पलवलमधून गायब झालेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रकरण 2017 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला होता. 2012 पासून आपला भाऊ गायब असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. आमच्या वडिलांकडून ज्यांनी जमीन खरीद केली होती. त्यांच्याकडून पैसे आणण्यासाठी माझा भाऊ गेला होता. तेव्हापासून तो गायबच आहे. हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविले होते.