मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप मुश्रिफांवर केले होते. त्यानंतर आजपर्यंत सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यातच किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार करत सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.
हसन मुश्रीफ यांनी,”माझ्या बदनामीसाठी षड्यंत्र रचले जात असून यामागचा बोलवता धनी लवकरच उघड करू, अशा इशाराही त्यांनी दिला. सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचेही ते म्हणाले. किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत.
ते पुढे म्हणाले की, सोमय्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत त्याचा मी निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप आरोप निराधार आहेत. शेअर, तारणावर कर्ज घेतलं, नातेवाईकांना कर्ज दिलं हे आरोप खोटे आहे. आम्ही आवाहन केल्यानंतर पैसे गोळा झाले. त्यावर महिन्याला पाच किलो साखर आणि अन्य सोयी देत असतो. मी ठरवल्यास 100 कोटी जमवू शकतो. मी कोणत्याही संकटाला पार करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांकडून 10 हजार आणि 5 राष्ट्रीयीकृत बँक कर्ज घेऊन माझ्या तीन मुलांनी कारखाना उभा केला.
कोल्हापूर जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार झाला नसून बदनामीसाठी षडयंत्र सुरु असल्याचेही मुश्रीफ म्हणाले. व्यक्तिगत आरोप करा, शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. हे निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र सुरू आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार आहे. केवळ आरोपापोटी छापे घालण्याचे हे जागतिक रेकॉर्ड होईल, असा खोचक टोला देखील यावेळी मुश्रिफांनी लगावला.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत राज्य सरकारकडून 39 हजार शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ठेव म्हणून ठेवली. त्या रकमेवर आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप केला आहे. कर्जासाठी दिलेल्या रकमेचा एकही कागद नाही. ठेवीच्या बदल्यात कर्ज दिल्याचे म्हटलेले नाही. शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. ताबडतोब विशेष लेखापरीक्षण करून संचालक मंडळ बरखास्त करावे व सहकार आयुक्तांनी या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.