वाई – करोना प्रादुर्भावाच्या तीन महिन्यांच्या काळात राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवण्यात आली, अनेकांनी ती भरली. राज्यातील अनेक संघटनांनी बिल माफ करण्याची मागणी केली. परंतु महावितरणने या मागणीला केराची टोपली दाखवीत भरमसाठ बिले भरण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे.
राज्याच्या मंत्र्यांनीसुध्दा नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता येणारी लाईट बिले भरावी लागतील असा फतवा काढल्याने महावितरण कंपनीने ग्राहकांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे, तरी त्वरित वाढीव बिले रद्द करण्यात यावीत व येणारी बिले तीन हप्त्यात भरण्याची मुभा मिळावी अन्यथा वाई तालुका भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल, असे निवेदन भाजपच्यावतीने वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात असेही म्हटले आहे, तीन महिन्याचे प्रत्यक्षात रिडींग घेऊन नागरिकांना बिले पाठवण्यात आली आहेत. ती बिले आकरताना त्यात जुनी भरलेली रक्कम वजा न करण्यात आल्याने मोठी रक्कम भरण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रचंड असंतोष आहे.
औद्योगिक ग्राहकांची सुद्धा तीच अवस्था आहे. त्यामुळे ग्राहकांकडून सक्तीने वसुली न करता त्यांच्यावर सरसकट आर्थिक भार न टाकता सुयोग्य हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची मोकळीक देणे नितांत गरजेचे आहे. यावर तातडीने विचार केला जावा अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनावर भाजप शहराध्यक्ष राकेश फुले, तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, वाई विधानसभा विभाग प्रमुख सचिन घाटगे, शहर सरचिटणीस सचिन गांधी, शहर उपाध्यक्ष अनिल महांगडे, शहर कामगार आघाडी प्रमुख तुषार सुळके, श्रीरंग दिवेकर, अभिजित सुतार, अक्षय दुरगुडे, सर्जेराव देशमाने, अजय कामटे व दीपक जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.