नवी दिल्ली – कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. याशिवाय या वादावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा चालू झाले आहेत. भाजपा नेते आणि बोम्मई सरकारमधील ऊर्जा मंत्री सुनील कुमार यांनी या प्रकरणावरून कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना हिजाब घालण्यास सांगणारा कायदा आणण्याची शक्यता आहे. असा निशाणा सुनील कुमार यांनी कॉंग्रेसवर लगावला आहे. त्यामुळे हिजाबच्या वादाचे रुपांतर आता काँग्रेस विरुद्ध भाजप झाल्याचे दिसून येत आहे.
काय आहे हिजाब वाद?
कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावर बंदी आणली गेली आहे. दरम्यान 1 जानेवारी रोजी सहा मुस्लिम विद्यार्थिनींना उडुपी येथील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये वर्गात जाण्यापासून रोखण्यात आले होते. या सर्व विद्यार्थिनीं हिजाब परिधान केला होता. कॉलेज व्यवस्थापनाने हिजाब बंदीमागे नवीन समान कायद्याचे कारण सांगितले. हे प्रकरण आता उडुपीमधील इतर सरकारी महाविद्यालयांमध्येही पसरले आहे. कुंदापुरा महाविद्यालयातील 28 मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. तेव्हापासून अनेक विद्यार्थिनी हिजाबवरील बंदीला विरोध करत आहेत.
यामध्ये एक मुस्लीम विद्यार्थिनी येताच काही भगवे शेले घातलेल्या विद्यार्थ्यांनी तिला घेराव घातला आणि ”जय श्री राम” अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर मुलीनं ”अल्लाह हू अकबर” म्हणत या मुलांना उत्तर दिले. तरीही हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. सध्या या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.