लखनौ, दि.10 -केंद्रीय कृषी कायदे राक्षसरूपी आहेत. शेतकऱ्यांनाच संपवण्याचा त्यांचा उद्देश आहे. मात्र, केंद्रात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास ते कायदे रद्द केले जातील, अशी ग्वाही पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी दिली.
उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये कॉंग्रेसने शेतकरी पंचायतीचे आयोजन केले होते. त्यामध्ये बोलताना प्रियांका यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे बाजार समित्या बंद पडतील. शेतमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळणार नाही. साठेबाजीला उधाण येईल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास शेतकऱ्यांचा आवाज कमजोर बनेल आणि अब्जाधीशांचा आवाज वाढेल. मात्र, कॉंग्रेस तसे घडू देणार नाही. कृषी कायदे रद्द होईपर्यंत कॉंग्रेसचा लढा सुरूच राहील. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोदी आणि भाजप नेत्यांकडून अपमान केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. कायदे मागे घ्यावेत, ही शेतकरी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. त्या मागणीला आणि शेतकरी आंदोलनाला कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे.
ु