बीजिंग : मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन सर्व देशांच्या रडारवर आले असल्याचे दिसत आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या जवानांच्या चकमकीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातारवण निर्माण झालं आहे. त्यानंतर आता फिलिपिन्सनेदेखील चीनला इशारा देत दक्षिण चीन महासागरातील युद्धसराव थांबवण्यास सांगितले आहे. चीनने युद्धसराव न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतील, असा इशारा फिलिपिन्सनं दिला आहे.
दक्षिण चीन महासागरात चीनने युद्धसराव न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणांमांना सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया फिलिपिन्सचे परराष्ट्र सचिव तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी दिली. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) १ जुलैपासून पेरासेल बेटांनजीक युद्धसराव करत आहे. तसंच युद्धसरावामुळे सर्व जहाजांना या क्षेत्रात नेव्हिगेट करण्यापासून रोखण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
पीएलए ज्या ठिकाणी युद्धसराव करत आहे त्या ठिकाणी पेरासेलवरून जाणारे पाणीही बंद करण्यात आले आहे. हे पाणी व्हिएतनाममधील औषध कंपन्यांसाठी देण्यात येते. चीनने आता फिलिपिन्सच्या क्षेत्रावर कब्जा करू नये असे म्हणत तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी चिंताही व्यक्त केली. जर चीननं हा युद्धसराव सुरू ठेवला तर त्यांना याचा गंभीर परिणाम मग तो कोणत्याही स्तरावरील असो तो भोगावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी चिनी तटरक्षक जहाजामुळे व्हिएतनामच्या मच्छीमारांची एक बोट बुडाली होती. त्यामध्ये आठ मच्छीमारांचा समावेश होता. त्यानंतर व्हिएतनामने चीनचा निषेध केला होता. त्यावेळीदेखील फिलिपिन्सने व्हिएतनामची बाजू घेतली होती. तसंच समुद्रातील मोठ्या भागात नव्या प्रदेशांतच्या केलेल्या घोषणेचाही विरोध केला होता. एकीकडे करोनाचे संकट असताना चीनकडून अशा कृती केल्या जात असल्यानंही त्यांना विरोध करण्यात आला होता.