कराड – मेरवेवाडी तलावातून कराड तालुक्यातील 16 गावांना पाणी देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद निवडणुकी वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करवडी येथील सभेत दिले होते. यानंतर या 16 गावांच्या पाणी प्रश्नासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजय शिवतारे, कृष्णा खोरे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांचेकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच आज सुमारे 2.5 टीएमसी पेक्षा जास्त पाणी आरक्षणाला मंजूरी मिळाली आहे. यामुळे या 16 गावांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.
कराड तालुक्याच्या पूर्व भागातील 16 गावे ही कायम दुष्काळी भागात येतात. या गावांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मेरवेवाडी तलावातून या गावांना पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. मात्र उन्हाळ्यात या तलावातील पाणीसाठा कमी होतो आणि लोकांना पिण्यासाठी आणि पशुधनासाठी पाण्याची समस्या निर्माण होते.
टेंभू योजनेचा कालवा हा या गावापासून हाकेच्या अंतरावरून जातो. मात्र या पाण्याचा या लोकांना काहीच फायदा होत नाही. ही गावे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात येत नसतानाही हा प्रश्न भाजपा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी जिल्हा परिषद निवडणुकी वेळी उचलला आणि टेंभू योजनेचे पाणी मेरवेवाडी तलावात सोडून या 16 गावांना पिण्यासाठी व पशुधनासाठी देण्यात यावे, अशी मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे केली. त्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यानंतर वेताळ यांनी प्रशासकीय पातळीवर या कामासाठी पाठपुरावा केला. त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, प्रांतिक सदस्य भरत पाटील, जि. प. सदस्य सागर शिवदास, पं. स. चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांचे सहकार्य मिळाले.
16 गावांतील ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन शासन दरबारी या पाण्यासाठी पाठपुरावा केला. अनेक वर्षांपासून या योजनेचे पाणी डोळ्यासमोरून सांगलीकडे जात होते. मात्र या पाण्यावर कराड तालुक्यातील या दुष्काळी गावांचा हक्क असूनही त्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले होते.
मात्र भाजप सरकारने लाभ क्षेत्रात नसतानाही लोकभावनेचा विचार करून लाभ क्षेत्रात नसणाऱ्या गावांना पाणी मिळवून दिले आहे. आता मात्र जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता च. अ. कुलकर्णी यांनी पाणी आरक्षणा संबंधी आदेशाचे पत्र काढल्याने या भागाचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी निकाली निघणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे 16 गावांतील लोक सरकारला धन्यवाद देत आहेत.
मेरवेवाडी, वाघेरी, कामथी, पाचुंद, करवडी, रिसवड, शामगांव, अंतवडी, विरवडे, वडोली निळेश्वर, पार्ले, बनवडी, राजमाची, बाबरमाची, हजारमाची, वनवासमाची या 16 गावांच्या पाणी प्रश्नांची सोडवणूक गेल्या अनेक वर्षांपासून विद्यमान लोकप्रतिनिधींना करता आली नव्हती. परंतु आम्ही शासन दरबारी सतत पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालो. लाभ क्षेत्रात नसणाऱ्या गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य मिळाले. सततच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत.
रामकृष्ण वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा.