कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये आठ टप्प्यांमध्ये का मतदान पुकारण्यात आले आहे असा सवाल सर्वच पातळ्यांवरून केला जात असून निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सार्वत्रिक टीका केली जात आहे. त्याला उत्तर देताना पश्चिम बंगाल प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे की, या राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यास पुढील निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जातील. राज्यात दहशतीचे वातावरण असल्याने या निवडणुका विभागून घ्याव्या लागत आहेत.
आम्हीं सत्तेवर आल्यानंतर पश्चिम बंगाल मधील राजकीय दहशत आम्ही संपवून टाकू असे ते म्हणाले. राजकीय हिंसाचाराला रोखण्यासाठीच या राज्यात आठ टप्प्यांमध्ये मतदान घ्यावे लागत आहे. या हिंसाचारावर नियंत्रण आणण्याचे काम आमचा पक्ष करेल असे घोष यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या चाय पे चर्चा कार्यक्रमात बोलताना सांगितले. दरम्यान निवडणुकांच्या टप्प्यांविषयी राजकीय पक्ष अशी घोषणा कशी करू शकतो असा सवाल उपस्थित करत तृणमुल कॉंग्रेसचे नेते सौगत रॉय यांनी घोष यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. त्यांनी अशा प्रकारचे चमत्कारिक विधान कशाच्या आधारावर केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.