दुबई :- टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी एक संधी मिळणार आहे. जर भारताने उर्वरित सर्व लढती मोठ्या फरकाने तसेच अव्वल रन रेट राखून जिंकल्या व अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला, तर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. अर्थात हे दिवास्वप्नच दिसत आहे.
या स्पर्धेत भारताचे दोन सामने झाले असून, एक पाकिस्तानकडून तर दुसरा न्यूझीलंडकडून पराभवही स्वीकारावा लागला. आता या स्थितीत भारतीय संघाला स्कॉटलंड, नामिबिया व अफगाणिस्तान यांच्याशी सामना खेळायचा आहे. हे सर्व सामने जिंकले तर भारताचे सहा गुण होतील.
त्याचवेळी अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला व न्यूझीलंडनेही त्यानंतरचे दोन सामने जिंकले तर या तिनही संघांचे गुण सहा होतील. त्यावेळी सरस धावगतीच्या जोरावर अग्रेसर असलेला संघ उपांत्य फेरीत पात्र ठरेल. हे सर्व गणित जमून येणे सध्यातरी कठीण दिसत असले तरीही कोणत्याही खेळात कोणत्याही क्षणी कलाटणी मिळालेली आपण पाहिलेली आहे. त्यामुळे आता अशाच चमत्कारावर भारतीय संघाला अवलंबून राहावे लागणार आहे.
आफगाणिस्तानविरुद्धचा सामना महत्त्वाचा
भारताचा बुधवारी होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सामन्यात जर भारतीय संघ पराभूत झाला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो या मरो, असाच असणार आहे.
एकदिवसीय संघाचे नेतृत्वही धोक्यात
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर टी-20 संघाचे नेतृत्व सोडणार आहे. मात्र, संघाची कोहलीच्या नेतृत्वाखालील कामगिरी पाहता ही स्पर्धा संपल्यावर त्याचे एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. तसेच या स्पर्धेनंतर भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळणार असून, त्यातून रोहित शर्माला विश्रांती दिली जाणार आहे. यावेळी संघाचे नेतृत्व या मालिकेपुरते लोकेश राहुलकडे सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मालिकेतून कोहलीदेखील विश्रांती घेण्याची शक्यता आहे.