लखनौ – उत्तर प्रदेशात महिला अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसतंय. अशातच राज्यातील चित्रकूट व प्रतापगढ येथील बलात्कार व छेडछाडीस बळी पडलेल्या दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकरणं उघडकीस आली आहेत. चित्रकूट येथील १४ वर्षीय मुलीने गळफास घेत तर प्रतापगढ येथील १७ वर्षीय मुलीने छेडछाडीला कंटाळून विहरीत उडी घेत आत्महत्या केली. चित्रकूट येथील बलात्कार पीडितेची तक्रार नोंदवून न घेतल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
चित्रकूट येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली. ८ ऑक्टोबरच्या रात्री पीडित मुलगी घराजवळील जंगली भागात सौचासाठी गेली असता काही नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिचे हातपाय बांधून तेथेच फेकून दिलं असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना पीडित मुलीच्या आईने, “हातपाय बांधलेल्या अवस्थेत पीडित मुलगी सरपटत कशीतरी घरापर्यंत पोहचली. आम्ही पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी आल्यानंतर त्याच अवस्थेत तिचे फोटो काढले. बलात्कार करणाऱ्यांना तू ओळखतेस का? अशी विचारणा पोलिसांनी मुलीकडे केली. मुलीने ओळखत नसल्याचं सांगितल्यावर पहिल्यांदा बलात्काऱ्यांची ओळख पटवा मग तक्रार नोंदवू असं सांगितलं. पोलिसांच्या भूमिकेमुळे मुलगी प्रचंड विचलित झाली आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं.” असा आरोप लगावला.
दरम्यान, या घटनेनंतर चित्रकूटचे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस महासंचालक यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस महासंचालकांनी याबाबत बोलताना, “कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलीस चौकी व ठाणे प्रमुखांना निलंबित करण्यात आलं असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.” अशी माहिती दिली.
प्रतापगढ जिल्ह्यातील बाघराय गावात घडलेल्या अशाच एका प्रकरणातील पीडितेने परिसरातील टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता ११वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीची गेल्या सहा महिन्यांपासून परिसरातील तीन टवाळखोर मुले छेड काढत होती. या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.