कोपरगाव -शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा व शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम व्हावा, यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार चांगला झाला असून बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय तातडीने घेतले जात आहेत.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीनेदेखील असे निर्णय घेवून शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी आदी सर्वच घटकांचे हित साधतांना चांगली कामगिरी केली असून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यभार आदर्श असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणचाचा तनपुरे यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, व्यापारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांचा कशाप्रकारे कोणते निर्णय घेवून फायदा होत आहे, याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. राहुरीचे व्यवस्थापन अतिशय उत्तम असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे वेळेवर पेमेंट मिळते.
शेतमालाची देवाण घेवाण व्यवस्थित आहे. हमाल मापाडी यांच्या समस्या नाहीत. एकूणच समृद्ध अशी कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी अनुभवले. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे राबविलेल्या उपाय योजनांप्रमाणे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील अशा प्रकारच्या उपाय योजना राबविल्यास सर्वच घटकांना त्याचा फायदा मिळू शकतो
त्यासाठी यापुढील काळात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांचे दृष्टीने काही योजना राबविल्यास निश्चितपणे फायदा होईल, असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.