सतत “डिस्कनेक्ट’मुळे ग्राहक वैतागले : सेवा सुधारल्याची नुसतीच “आयडिया’
पुणे – नेटवर्क कनेक्शनमधील अडथळ्यांनी आयडिया व वोडाफोन मोबाइल कंपनीचे ग्राहक त्रस्त झाले आहेत; परंतु या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असून नेटवर्क अपग्रेडेशन अंतिम टप्प्यात आल्याचा दावा आयडिया-वोडाफोनने केला आहे. याबाबत “आयडिया’कडून ग्राहकांना त्या प्रकारचे एसएमएस पाठवण्यात आले असून नेटवर्कमध्ये अडथळे आल्यास काही दिवस सहकार्य करण्याची विनंतीही कंपन्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी, ग्राहकांना दोन्ही कंपन्यांनी नेटवर्कमध्ये मोठे बदल करून चांगल्या प्रकारचे नेटवर्क आणि हाय-स्पीड देण्याचे सांगितले होते. या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ केल्याचा दावा केला आहे. याआधी दोन्ही शहरात दोन्ही कंपन्यांचे 1,574 टॉवर्स कार्यरत होते. त्यामध्ये, आता वाढ करून 2 हजार 13 टॉवर्सची उभारणी करण्यात आली आहे. “एलटीई’ अर्थात “लॉन्ग टर्म इव्होल्यूशन’ नेटवर्कचा पुरवठा करणारे 900 बॅंड ठिकठिकाणी बसविल्याने व्हॉइस कॉल आणि इंटरनेटमध्ये अडथळे येणार नाहीत.
याचबरोबर “फोर-जी’ इंटरनेटचा वेगही वाढणार आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी पुढील काही दिवस आयडिया आणि वोडाफोनच्या कनेक्शनमध्ये काही ठिकाणी अडथळे येण्याची शक्यताही कंपनीकडून वर्तवण्यात आली आहे.
मागील तीन महिन्यांपासून आयडियाच्या ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कंपनीने नेटवर्क सुरळीत होण्यासाठी लवकरात-लवकर बदल करावा, अन्यथा सदर कंपनीचे ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे.
– नितीन शिंदे, आयडिया कंपनीचे ग्राहक