उरुळी कांचन (पुणे)- पुणे-सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन परिसरातील ग्राहकांना मागील सहा महिन्यांपासून आयडिया कंपनीची नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे कॉल ड्रॉप होणे, आवाज ऐकायला न येणे, फोन ज्याला लावला आहे तो सोडून दुसरीकडेच लागणे, क्रॉस कनेक्शन होणे अशा समस्यांमुळे पूर्व हवेलीतील आयडिया कंपनीचे ग्राहक मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे.
पूर्व हवेलीतील नागरिकांनी आयडिया कंपनीचे पोस्टपेड नंबर एक हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत खरेदी केले होते. त्यातच सत्तर टक्के नागरिकांनी आयडिया कंपनीच्या नेटवर्कला प्राधान्य दिले होते. परंतु काही कालावधीनंतर नेटवर्क सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
यामुळे बॅंकिंग सेवेवर परिणाम होत आहे. प्रत्येक मोबाईल फोनवर फोन पे, गूगल पे, अमेझॉन पे, भारत पे, पेटीयम यासारख्या डिजिटल व्यवहार करण्यासाठी नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे व्यवहार खोळंबलेले दिसत आहेत. सध्या पूर्व हवेलीतील सर्वच भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता टॉवरची संख्या कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
कॉल ड्रॉप आणि नेटवर्क सेवा यामुळे आयडिया कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. एकीकडे मोफत कॉलिंग सेवा व इंटरनेट पॅक करिता आकर्षक सवलती जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करतात. याबाबत संबंधित कंपनीकडे तक्रार केली असता त्या कंपनीकडून मिळणाऱ्या प्रतिसादाने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अनेकवेळा तक्रार करूनही कोणतीही दखल न घेता, तीच सेवा पुढे सुरू असते. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
<
blockquote>मागील सहा वर्षांपासून आयडिया कंपनीचे सिमकार्ड वापरत आहे. परंतु इतकी विस्कळीत सेवा आजपर्यंत अनुभवली नाही. वारंवार कंपनीला फोन करुन तक्रार केली असता आठ दिवसांत ठीक होईल, दहा दिवसांत ठीक होईल, अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे आयडिया कंपनीचे सिमकार्ड बंद करून दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये सामील होणार आहे.
– उमेश काटवटे, ग्राहक, कदमवाकवस्ती.