संस्थेचा धक्कादायक अहवाल
पुणे – भारतातील जंगल क्षेत्रात तब्बल 28 टक्क्यांनी वाढ होत असल्याचा अहवाल केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने सोमवारी जाहीर केला. मात्र, त्याच वेळी जागतिक पर्यावरणीय समस्येचा सर्वांत मोठे शिकार हे वृक्ष होत असल्याचा अहवाल जागतिक संस्थेने सादर केला आहे. अहवालानुसार, जगभरातील तब्बल 3,229 वृक्षप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, यामध्ये आशिया खंडातील प्रजातींची संख्या लक्षणीय असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंटनॅरशन युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आयसीयूएन) या संस्थेने नुकतीच सर्वांत धोकादायक प्रजातींची यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही वृक्ष प्रजातींची आहे. याव्यतिरिक्त सस्तन प्राणी, कीटक, पक्षी, उभयचर प्राणी, मासे अशा विविध प्रकारच्या वन्यजीवांचा समावेश आहे.
या अहवालानुसार, जगातील हरित आच्छादन झपाट्याने कमी होत असल्याने, अनेक वन्यप्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दहा वर्षांत हरित आच्छादनामध्ये झपाट्याने घट होत असून, विविध वनस्पती प्रजाती या सर्वाधिक जलद गतीने कमी होत आहेत. 2009 मध्ये धोकादायक वर्गातील वनस्पतींची संख्या 1,577 होती. ती गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढून 3,229 इतकी झाली आहे.
आपल्याकडे निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात आहे, मात्र त्याबाबत फारशी जागरूकता नाही. देशातील कित्येक वनस्पती प्रजातींची नोंद देखील होत नाही. तर आहे त्या प्रजातींचे महत्त्व नागरिकांना समजत नसल्याने वृक्षतोड केली जाते. अनेक विकासप्रकल्पांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीची पुनर्लागवड आवश्यक असताना, ती होत नाही. त्यामुळेच अनेक वनस्पती प्रजाती या धोकादायक अवस्थेत पोहचल्याचे वनस्पती अभ्यासक सांगत आहेत.